पुणे : काश्मीरच्या पहलगाम येथे २ दिवसांपूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. यामध्ये पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचाही मृत्यू झाला आहे. या दोघांचे मृतदेह गुरुवारी सकाळी पुण्यात आणला गेला. पुणे विमानतळावरुन या दोघांचे पार्थिव त्यांच्या घरी अंत्यदर्शनासाठी नेण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार अध्यक्ष शरद पवार यांनी संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांच्या घरी जाऊन पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.
शरद पवार हे संतोष जगदाळे यांच्या अंत्यदर्शनासाठी कर्वेनगरमधील त्यांच्या घरी गेले होते. त्यावेळी शरद पवार यांनी संतोष जगदाळे यांच्या पत्नी आणि मुलीशी संवाद साधला. यावेळी बैसरन व्हॅलीत दहशतवादी हल्ल्या झाला तो प्रसंग संतोष जगदाळे यांच्या पत्नीने शरद पवार यांना सांगितला.
‘दुपारी साडेतीन चारच्या सुमारास हे घडलं. आमचा काश्मीरमध्ये फिरण्याचा पहिलाच दिवस होता. दहशतवाद्यांनी प्रतिकार करणाऱ्या घोडेवाल्यालाही मारलं. तो पर्यटकांना मारु नका, असे सांगत होता. दहशतवाद्यांनी तोंडावर मास्क घातले होते. लोकांचे जीव धोक्यात घालणं, लोकांचं जीवन उद्ध्वस्त करणं थांबलं पाहिजे. आज माझा नवरा माझ्यासोबत नाही. आमचा माणूस आमच्या डोळ्यांदेखत गेला. तिथूनची स्थानिक लोकं आणि लष्कराचे अधिकारीही आमच्यासाठी रडत होते’, असे संतोष जगदाळे यांच्या पत्नीने शरद पवार यांना सांगितले.
“मी कालपासून माझ्या नवऱ्याचा चेहराही बघू शकली नाही. काश्मीरमध्ये असताना आम्हाला मृतदेहाचा चेहरा बघता आला नाही, इथेही त्यांचा चेहरा उघडू दिला जात नाहीये. दहशतवाद्यांनी माझ्या नवऱ्याच्या डोक्यात गोळी घातली. आमच्यासाठी काहीतरी करा. त्या दहशतवाद्यांना शोधा आणि मारा. दहशतवाद्यांनी आमच्या लोकांच्या डोक्यात गोळी घालून मांस बाहेर काढलं, रक्त काढलं, तसंच त्यांच्यासोबत करा आणि दहशतवाद्यांचे मृतदेह आम्हाला दाखवा. दहशतवाद्यांनी लहान मुलांसमोर त्यांच्या वडिलांना गोळ्या घातल्या. तेव्हा लहान मुलं रडत होती. तिकडून खाली उतरताना आम्ही चिखलात पडलो. त्यामुळे मला पायांवर उभंही राहता येत नाही”, असे संतोष जगदाळे यांच्या पत्नीने शरद पवार यांना सांगितले.
महत्वाच्या बातम्या
-शरद पवारांनी ठाकरेंना लिहिलेले ‘ते’ पत्र आयोगासमोर यायला पाहिजे; प्रकाश आंबेडकर स्पष्टच बोलले
-पुणे महापालिकेत सरकारी नोकरीची संधी; कशी आहे अर्ज प्रक्रिया
-काश्मीरमध्ये हल्ला: काश्मीरमधील पर्यटकांच्या मदतीसाठी महाराष्ट्रातील जोडपे पुढे सरसावले
-फिरायला गेले ते परतलेच नाहीत! कश्मीर हल्ल्यात पुण्याच्या २ जिवलग मित्रांचा मृत्यू
-युपीएससी २०२४चा निकाल जाहीर! पुण्याच्या अर्चित डोंगरेने पटकावला महाराष्ट्रात प्रथम क्रमांक