पुणे : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन यासह सर्व महत्त्वाच्या विभागांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. युद्धजन्य परिस्थितीच्या संभाव्य धोक्याला तोंड देण्यासाठी राज्य सरकारने हा कठोर पवित्रा घेतला आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील सुरक्षा व्यवस्था आणि सज्जतेचा सविस्तर आढावा घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित होते.
या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मॉक ड्रिल, ब्लॅकआऊट यासह सर्व सुरक्षात्मक उपाययोजनांचा समग्र आढावा घेताना महत्त्वाचे निर्देश दिले. राज्यातील संवेदनशील परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्यावर भर देण्यात आला. बैठकीला प्रभारी मुख्य सचिव राजेशकुमार, राज्य पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती, मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, नागरी सुरक्षेचे अतिरिक्त पोलिस महासंचालक प्रभातकुमार, गृहविभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी, गुप्तवार्ता विभागाचे अतिरिक्त पोलिस महानिरीक्षक शिरीष जैन, तसेच मुंबई आणि मुंबई उपनगरांचे जिल्हाधिकारी उपस्थित होते.
या आढावा बैठकीतून राज्य सरकारने संभाव्य संकटाला तोंड देण्यासाठी पूर्ण तयारी दर्शवली आहे. युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि प्रशासकीय यंत्रणेच्या समन्वयासाठी सर्व विभागांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी प्रशासनाला कोणत्याही परिस्थितीत तत्पर आणि प्रभावीपणे कार्य करण्याचे निर्देश दिले, जेणेकरून राज्यातील जनजीवन सुरक्षित राहील.
मुख्यमंत्र्यांनी कोणते निर्देश दिले?
– प्रत्येक जिल्ह्यात मॉकड्रिल करा आणि जिल्हा स्तरावर वॉर रूम स्थापित करा.
– ब्लॅकआऊटवेळी हॉस्पिटलसोबत समन्वय यंत्रणा उभी करा. टार्गेट होऊ नये म्हणून लाईट बंद केले जातात, त्यामुळे पर्यायी विद्युत व्यवस्थेद्वारे यंत्रणा सुरू ठेवून, गडद रंगाचे पडदे अथवा गडद रंगाच्या काचा वापरून त्याचवेळी बाहेरून लाईट दिसणार नाही, अशी व्यवस्था करा.
– ब्लॅकआऊट म्हणजे काय आणि अशावेळी काय करावे, यांचे व्हिडिओ विद्यार्थी, नागरिकांपर्यंत पोहोचवा. व्यापक जनजागरण करा.
– केंद्र सरकारच्या ‘युनियन वॉर बुक’ चे सखोल अध्ययन करीत सर्वांना त्याची माहिती द्या.
– प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांच्या सायबर सेलने समाजमाध्यमांवर देखरेख ठेवत पाकिस्तानला मदत करणारे हॅण्डल ओळखून त्यावर कारवाई करा. शत्रूला मदत करणारी अथवा चुकीची माहिती कुणी प्रसारित करीत असेल तर त्यावर कारवाई करा.
– प्रत्येक जिल्हाधिकारी यांना आपत्कालीन फंड आजच देणार, ज्यातून काही तातडीच्या साहित्याची खरेदी करायची असतील तर ती तत्काळ करता येईल. याव्यतिरिक्त कोणताही महत्वाचा प्रस्ताव यासंदर्भात आला तर तो 1 तासात मंजूर करा.
– एमएमआर क्षेत्रातील सर्व महापालिकांची बैठक घ्या, त्यांनाही ‘ब्लॅकआऊट’ बाबत जागरूकता निर्माण करण्यास सांगा. यामध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांना सहभागी करून घ्या.
– पोलिस विभागाने नेहमीपेक्षा जास्त जागरूकता ठेवावी. देशद्रोही व्यक्तींच्या कारवाया वाढण्याची शक्यता पाहता अधिक कोंबिग ऑपरेशन करा आणि गस्त अधिक चोख करा.
– सैन्याच्या तयारी संबधित गतिविधीचे चित्रिकरण करणे आणि ते समाजमाध्यमांवर प्रसारित करणे हा गुन्हा आहे, त्यावर तत्काळ गुन्हे दाखल करा.
– सागरी सुरक्षा वाढविण्यासाठी आवश्यकतेनुसार फिशिंग ट्रॉलर्स भाड्याने घ्या
– नागरिकांना परिस्थितीबाबत अद्ययावत व खरी माहिती पोहोचवणे यासाठी शासनाकडून व्यवस्था उभी करा.
– शासनाच्या अतिमहत्वाच्या पायाभूत सुविधा (उदा. विद्युतनिर्मिती, वितरण) यावर सायबर हल्ले होण्याची शक्यता लक्षात घेता सायबर विभागाकडून त्वरित सायबर ऑडिट करून घ्या.
– सरकार आणि सुरक्षा यंत्रणा यात अधिक समन्वयासाठी मुंबईतील सैन्याचे तिन्ही दल तसेच कोस्टगार्डच्या प्रमुखांना पुढील बैठकीत व्हीसी माध्यमातून निमंत्रित करा.
महत्वाच्या बातम्या
-भारत-पाक युद्ध झालं तर पुणे टार्गेटवर; नेमकं काय कारण?
-भारत-पाकिस्तान युद्ध: पुण्यावर काय परिणाम? शहराबाहेर जाण्याचा प्लान करण्याआधी हे वाचाच…
-‘यापुढे कोणत्याही प्रकारचा हल्ला खपवून घेतला जाणार नाही’; भारताचा पाकला इशारा
-‘आमचा तणाव वाढवण्याचा कोणताही हेतू नाही, पण पाकने तणाव वाढवला तर…’; अजित डोवालांचा इशारा