पुणे : जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या आज पुणे शहरात दाखल होत असून या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी पुणे महापालिकेने सर्व तयारी पूर्ण केली आहे. वारकऱ्यांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पालखी मार्गावर आरोग्य कक्ष, फिरती शौचालये आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. महापालिकेसह विविध सामाजिक संस्था, राजकीय पक्ष आणि पुणेकरांनीही पालख्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे.
संत तुकाराम महाराज यांची पालखी जुन्या मुंबई-पुणे महामार्गाने, तर संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी दिघी, विश्रांतवाडी, संगमवाडी मार्गे शहरात प्रवेश करेल. महापालिका आयुक्त नवल किशोर राम हे दोन्ही पालख्यांचे दर्शन घेऊन वैष्णवांचे स्वागत करणार आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात, तर संत तुकाराम महाराज यांची पालखी नाना पेठेतील श्री निवडुंगा विठोबा मंदिरात मुक्काम करेल. शनिवारी दिवसभराच्या विश्रांतीनंतर रविवारी (२२ जून) पहाटे दोन्ही पालख्या पंढरपूरकडे प्रस्थान करतील.
पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांच्या सोयीसाठी महापालिकेसह सामाजिक संस्था, सार्वजनिक मंडळे, राजकीय नेते आणि पुणेकरांनी व्यवस्था केली आहे. स्वागतासाठी चौकाचौकात स्वागत कक्ष, कमानी आणि पावसापासून संरक्षणासाठी पत्र्याचे शेड उभारण्यात आले आहेत. सध्या पावसाचा जोर असल्याने रस्त्यावरील पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेने विशेष पथके तैनात केली आहेत.
निवडुंगा विठोबा मंदिर आणि पालखी विठोबा मंदिर परिसरात महापालिकेने मंडप उभारले आहेत. याशिवाय, मदत केंद्र, आगप्रतिबंधक सेवा, सीसीटीव्ही कॅमेरे, हरवलेल्या व्यक्तींसाठी शोध केंद्र, आरोग्य सुविधा केंद्र आणि जनजागृती केंद्र अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच, व्यापारी, राजकीय नेते आणि सार्वजनिक मंडळांनी विविध ठिकाणी पत्र्याचे शेड उभारून वारकऱ्यांसाठी निवारा आणि भोजनाची व्यवस्था केली आहे.
महत्वाच्या बातम्या
-‘तुमचा वस्ताद अजितदादा अन् त्यांनीचं तुम्हाला लंगोट…’, महेश लांडगेंना राष्ट्रवादीचं सडेतोड उत्तर
-भाजप शहराध्यक्ष धीरज घाटेंवर वीज चोरीचा आरोप; नेमकं काय प्रकरण?
-नितेश राणे म्हणाले ‘कोण वसंत मोरे?’ तात्यांनी लावला ‘तो’ व्हिडीओ
-पुण्याला पावसाने झोडपलं, जिल्ह्यात १०० मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद