बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या प्रचार शुभारंभ केला. यावेळी बोलताना अजित पवारांनी कारखान्याच्या निवडणुकीत ‘कारखान्याचा चेअरमन मीच होणार आहे. माझ्याकडे बघून मतदान करा’, असे आवाहन अजित पवार यांनी केले. ‘जर पाच वर्षे भाव नाही दिला तर नावाचा अजित पवार नाही’, असाही शब्द यावेळी अजित पवारांनी दिला आहे.
“जोपर्यंत त्यांचे हात-पाय हालतात, तोपर्यंत ते सर्वांचे भले करतील. जेव्हा त्यांना वाटेल की कोणी त्यांच्यापेक्षा चांगले काम करू शकते, तेव्हा ते स्वतःहून बाजूला होतील. माळेगाव कारखान्याचा चेअरमन म्हणून ते स्वतःच निवडणूक लढवणार असून, मतदारांनी त्यांच्याकडे पाहून मतदान करावे. कारखान्याने पाच वर्षे सभासदांना योग्य भाव दिला नाही, तर आपण अजित पवार नावाला लायक नाही”, असेही ते म्हणाले.
‘अजित पवारला पैशाची गरज नाही, बाप जाद्याच्या कृपेने बर चाललं आहे, मी सत्तेला हापापलो नाही. मी चांगलं काम करेल का ८५ वर्षांचा चांगले काम करेल? असे म्हणत अजित पवारांनी पुन्हा एकदा वयाचा मुद्दा उपस्थित केला. कारखाना निवडणुकीतील विरोधक असलेल्या ८५ वर्षे वयाच्या चंद्रराव तावरे यांना’ अजित पवारांनी टोला लगावला.
‘जोपर्यंत माझे हात पाय हालतात तोपर्यंत सगळ्यांचे भले करणार. जेव्हा मला वाटेल मला कोण उजवे आहे. मी आपोआप बाजूला जाईल. आपलं पॅनेल टू पॅनल मतदान करा. माझ्याकडे बघून मतदान करा. छत्रपती कारखाना हितासाठी आम्ही मागचे सोडून दिले. मी राजकारण करायचं तिथं करेल जिथं प्रपंचाचा विषय आहे, तिथं राजकारण करणार नाही. कारखान्याला गाडी मिळणार नाही. चहा मिळेल, कारखाना सुरु असेल तर रस मिळेल, हॉटेलचे बिल मिळणार नाही. आम्ही २० जणांचे राजीनामा घेतले आहेत. कुणी वेडेवाकडे काम केलं तर त्याचा राजीनामा मंजूर करणार आहे. आजच माळेगावचा चेअरमन जाहीर करणार. माळेगावचे भले करायचं असेल तर अजित पवारच करु शकतो’, असेही अजित पवार म्हणाले आहेत.
‘छत्रपती साखर कारखान्याला पैशांची गरज होती. मी एकाला सांगितले २५ कोटी पाहिजेत. त्याने चेअरमनला सांगितले कागदपत्रे द्या. त्याला परत फोन केला आणि त्याला सांगितले अजित पवारांची पत नाही का? त्याने संध्याकाळी पैसे पाठवले. दोन जण उठवायला लागतात तरी यांना डायरेक्टर व्हायचंय. अरे थांबणार कधी? मी कामाचाच माणूस आहे. मी फॉर्म भरला तर तुमच्या का पोटात दुखतं?” असा सवाल अजित पवारांना विरोधकांना केला.
‘आम्ही कारखाना उभा केला तर यांना का त्रास होतोय. माझा खासगी कारखाना काढायची अजिबात तयारी नव्हती. सरकारने बंधने घातले. आम्ही आमचे कारखाने कुणाला चालवयाला दिले नाहीत. पंपावर काम करून धीरूभाई अंबानी मोठे झालेत. मी जर सहकार मोडायला निघालो असतो तर मी संस्था मोठ्या केल्या असत्या का? मी एखाद्याला निवडून नाही द्यायचं म्हणालो तर काय करतो हे सगळ्या महाराष्ट्रला माहिती आहे. पुरंदर ने आणि शिरुरने पण बघितले आहे’, असे अजित पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
-अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?
-पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?
-अजितदादा भाषणाला उठताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला राडा; पोलिसांनी घेतलं ताब्यात
-मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं