पुणे : उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी उद्योगपती धीरुभाई अंबानी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याने सोशल मीडियावर व्हायरल झालं आणि विरोधकांनी अजित पवारांवर टीकेची झोड उठवली. विरोधकांनी केलेल्या टीकेला अजित पवारांनी उत्तर दिलं आहे. सध्या स्थानिक पातळीवर साखर कारखान्यांच्या निवडणुकीसाठी प्रचाराची धामधूम सुरू आहे. अजित पवार ठिकठिकाणी प्रचारसभा घेत असून, त्यांच्या या विधानामुळे राजकीय वातावरणात नव्या चर्चेला तोंड फुटलं आहे.
‘आपल्या वक्तव्याचा ‘ध’ चा ‘मा’ करून चुकीचा अर्थ लावला गेला आहे. काय बोलावं आणि काय बोलू नये हे आपल्याला चांगलं ठाऊक आहे’, असं म्हणत अजित पवारांनी टीकाकारांनी सुनावलं आहे. अजित पवारांनी बारामतीतील कार्यक्रमात धीरूभाई अंबानींचे उदाहरण देताना त्यांनी पेट्रोल पंपावर काम केल्याचा उल्लेख केला. “सहकार टिकवायचा नसता तर मी पंप काढले असते का? पंपावर गोरगरीबांची मुलं कामाला लागणं कमीपणाचं आहे का? धीरूभाई अंबानी पेट्रोल पंपावर काम करून कोट्याधीश झाले. कोणतंही काम कमीपणाचं नाही. पडेल ते काम करायची तयारी ठेवा, त्यातून सोनं निर्माण होतं,” असं अजित पवार म्हणाले. मात्र, त्यांच्या या विधानातील ‘पेट्रोल सोडून’ ऐवजी ‘पेट्रोल चोरून’ असा उल्लेख झाल्याचा दावा काही जणांनी केला, ज्यामुळे वाद निर्माण झाला आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवारांचा व्हिडीओ शेअर करत त्यांच्यावर टीका केली. “पेट्रोल चोरून कोट्याधीश झाले आणि तुम्ही? सिंचन घोटाळा, एमएससीबी घोटाळा करून काय कमावलंत?” असा सवाल त्यांनी सोशल मीडियावर उपस्थित केला. या टीकेमुळे अजित पवारांच्या विधानावरून चर्चा तापली. ‘धीरूभाई अंबानींबाबत आपण चुकीचं बोललो असेल तर राजकारण सोडेन’, असं अजित पवारांनी दुसऱ्या एका कार्यक्रमात स्पष्टीकरण देताना सांगितलं.
महत्वाच्या बातम्या
-माऊली…माऊली… येत्या २ दिवसांत ज्ञानोबा, तुकोबांच्या पालखीचे प्रस्थान; पालखीचं वेळापत्रक जाहीर
-अल्पवयीन मुलीशी तिसऱ्या लग्नाचा घातला घाट, पहिलीने लढवली शक्कल पण….वाचा नेमकं काय झालं?
-पुण्याच्या ‘आयटी पार्क’ला ‘वॉटर पार्क’ ओळख कोणामुळे?
-अजितदादा भाषणाला उठताच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घातला राडा; पोलिसांनी घेतलं ताब्यात