पुणे : पुण्यातील वैष्णवी हगवणे घटनेने शहरासह संपूर्ण राज्य हादरून गेले असून राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणामध्ये आता पोलिसांनी तपासाचा वेग वाढवला असून मुख्य आरोपी असलेल्या वैष्णवीचा पती शशांक, सासू लता आणि नणंद करिष्मा यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर २८ मे २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याशिवाय, राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांनाही २८ मेपर्यंत कोठडीत ठेवण्यात आले आहे. वैष्णवीच्या आत्महत्येपूर्वी नेमकं काय घडलं, याचा तपास आता पोलिसांकडून सखोलपणे केला जाणार आहे.
वैष्णवीच्या शरीरावर आढळलेल्या जखमांमुळे या प्रकरणात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. तिच्या अंगावर २९ जखमा असून त्यापैकी ५ ते ६ जखमा ताज्या असल्याचे तपासात समोर आले आहे. या जखमांसाठी वापरले गेलेले हत्यार अद्याप सापडलेले नाही. पोलिसांनी या हत्याराचा शोध घेण्यासाठी आणि प्रकरणाच्या मूळ कारणांपर्यंत पोहोचण्यासाठी आरोपींची कोठडी मागितली होती. न्यायालयाने पोलिसांची मागणी मान्य करत तिघांना २८ मेपर्यंत कोठडी सुनावली.
पोलिस तपासात नेमकं काय उघड?
वैष्णवीला तिच्या आत्महत्येच्या दिवसापर्यंत कुटुंबीयांकडून सातत्याने छळ सहन करावा लागला. तिच्या शरीरावरील जखमा हा छळाचा पुरावा मानला जात आहे. पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या माहितीनुसार, वैष्णवीवर शारीरिक आणि मानसिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात हगवणे कुटुंबियांचा सहभाग आणि त्यांचे इतर व्यक्तींशी असलेले संबंध तपासण्यासाठी पोलिसांनी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत.
पोलिसांनी हगवणे कुटुंबियांचे बँक खाते सील केले आहे. वैष्णवीचे सोने गहाण ठेवून त्यातून मिळालेल्या पैशांचा वापर कशासाठी झाला? याचा तपास अद्याप सुरु आहे. याशिवाय, फरार आरोपी निलेश चव्हाण आणि हगवणे कुटुंबियाचा नेमका काय संबंध? हा देखील शोध पोलिस घेत आहेत. सर्व आरोपींची एकत्रित चौकशी करून या घटनेचे उघड करण्यासाठी पोलिसांकडून शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.
महत्वाच्या बातम्या
-बीडचे देशमुख कुटुंबीय पुण्यातील कस्पटेंच्या भेटीला, म्हणाले “नराधमांनी आपली माणसे…”
-हृदय पिळवटून टाकणारी घटना: आईसह दोन चिमुकल्यांचा अर्धवट जळालेला मृतदेह, नेमकं काय प्रकरण?
-पुण्यात सायबर क्राईम वाढला; आमदार हेमंत रासनेंकडून ५ नवीन सायबर पोलीस ठाण्यांची मागणी
-नीलम गोऱ्हेंनी घेतली वैष्णवीच्या आई-वडिलांची भेट; म्हणाल्या, ‘महिला आयोगाच्या सदस्यांची…’
-‘निवडणूक आल्या की कोरोना कुठून तरी बाहेर निघतोय’; वसंत मोरेंना नेमकं काय म्हणायचं?