पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री उदय सामंत यांच्याभोवती चर्चा जोरात सुरू आहे. काही महिन्यांपूर्वी काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी एकनाथ शिंदेंची गरज संपली असून उदय सामंत यांचा प्रभाव वाढेल, अशी टिप्पणी केली होती. आता पुन्हा ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना सांगितले की, उदय सामंत यांच्या महत्त्वाकांक्षा वाढल्या असून, फडणवीस शिंदेंचे राजकीय महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे शिंदे गटात सामंत यांचे वर्चस्व वाढत असल्याचे दिसत आहे. सुषमा अंधारे यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवर भाष्य केलं आहे.
एखाद्या पक्षाचे प्रमुख मुख्यमंत्र्यांची भेट घेत असतील, तर त्याचे वेगळे अर्थ काढण्याची गरज नाही. राज ठाकरे हे स्वतंत्र पक्षप्रमुख म्हणून भेटू शकतात, यात काही गैर नाही. मात्र, त्या पुढे म्हणाल्या की, महाराष्ट्रातील जनतेची इच्छा आहे की ठाकरे बंधू एकत्र यावेत. युतीबाबत शिवसेना सकारात्मक आहे, परंतु याचा अर्थ आम्ही कमकुवत आहोत असा नाही. शिवसेनेने महाराष्ट्रातील द्रोह्यांशी लढण्याचा निर्धार केला आहे, मग ते कोणाबरोबर असो वा नसो. सुषमा अंधारे यांनी उदय सामंत यांच्या वाढत्या प्रभावावरही भाष्य केले.
“सध्या उदय सामंतांच्या महत्त्वकांक्षा या चरमबिंदूला पोहोचल्या आहेत. सध्या राजकीय पटावरून एकनाथ शिंदे यांचं महत्त्व खूप कमी झालं आहे. एकनाथ शिंदे हे चर्चेतून बाजूला झाले असून उदय सामंत यांचं महत्त्व वाढल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे शिंदेंच्या पक्षांमध्ये शिंदेंपेक्षा देखील उदय सामंत हे महत्त्वाचे नेते आहेत. हे दाखवण्याचा प्रयत्न ठरवून फडणवीसांकडून केला जात असण्याची शक्यता आहे”, असंही सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.
“देवेंद्र फडणवीस यांची ख्याती आहे की विकास कामाबाबत तत्परतेने व्यक्त होण्यापेक्षा कुटुंब, पक्ष आणि नाते संबंध तोडण्यासाठी अधिक तत्परतेने पुढे यायचं. आत्तापर्यंत फडणवीस यांनी बापापासून लेक, भावापासून बहीण, काका पासून पुतण्या तोडला आहे. आता ते भावापासून भाऊ तोडण्यासाठी देखील तत्पर आहेत. मात्र रक्ताची नाती ही अधिक घट्ट असतात”, असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
-मुलाचा पदवीदान सोहळा आणि लेकीला सरप्राईज द्यायला निघाले होते, पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं
-अहमदाबाद विमान दुर्घटना: केबिन क्रू मेंबरपैकी पिंपरीच्या २२ वर्षीय इरफानचा मृत्यू
-अरविंद केजरीवाल पुणे पालिका निवडणुकीच्या मैदानात; कार्यकर्त्यांच्या घेणार बैठका
-अहमदाबादमध्ये प्रवासी विमान नागरी वस्तीत कोसळलं, २४२ प्रवाशांना घेऊन टेकऑफ केलं अन्…