पुणे : शिवाजीनगर येथील कौटुंबिक न्यायालय आणि जिल्हा न्यायालयाच्या गेट क्रमांक ४ यांना जोडणारा भुयारी मार्ग गेल्या काही वर्षांपासून बंद आहे. या मार्गामुळे न्यायालय परिसरातील वाहतूक सुसाट झाली होती; मात्र २०२१ पासून पुणे मेट्रोच्या कामासाठी तो मार्ग बंद करण्यात आला. आता मेट्रोचे काम पूर्ण झाले असूनही हा मार्ग अद्याप सुरू करण्यात आलेला नाही.
या मार्गाचा वापर मोठ्या प्रमाणावर वकिल, न्यायालयीन कर्मचारी आणि पक्षकार करत असतात. भुयारी मार्ग बंद असल्याने परिसरात वाहनांची आणि पादचाऱ्यांची प्रचंड गर्दी होत असून, त्यामुळे अपघाताच्या घटनाही वाढल्या आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेचा आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
महापालिकेने २०१०-१२ च्या अंदाजपत्रकात या मार्गासाठी सुमारे १.५ कोटी रुपयांची तरतूद केली होती. २०१७-१८ मध्ये या भुयारी मार्गाचे उद्घाटनही करण्यात आले होते. काही काळ सुरळीत सुरू असलेला मार्ग मेट्रोमुळे बंद पडल्याने, नागरिकांच्या आणि न्यायालयीन यंत्रणेच्या दैनंदिन व्यवहारांवर परिणाम झाला आहे.
या पार्श्वभूमीवर पुणे बार असोसिएशनने महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांना पत्र लिहून हा भुयारी मार्ग तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे. हा मार्ग सुरू झाल्यास वाहतूक कोंडी कमी होईल आणि पादचाऱ्यांसाठी सुरक्षित पर्याय उपलब्ध होईल, असा विश्वास असोसिएशनने व्यक्त केला आहे. आयुक्तांनी या मागणीची तातडीने दखल घ्यावी, अशी वकिलांची अपेक्षा आहे.
महत्वाच्या बातम्या
-लांडगे पैलवान असले तरी त्यांचे वस्ताद अजितदादाच आहेत; राष्ट्रवादीचा सणसणीत टोला
-शनिवारवाडा ते स्वारगेट ‘चौपदरी भुयारी मार्ग’ प्रकल्पाला नितीन गडकरींचा सकारात्मक प्रतिसाद
-पालखी सोहळ्यात चोरांनी भाविकांच्या मोबाइलवर मारला डल्ला
-हुंड्याच्या छळामुळे उच्चशिक्षित महिलेने केली आत्महत्या, सासूविरुद्ध गुन्हा दाखल