बारामती : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण राज्यभरात त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात असताना, त्यांच्या पत्नी आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावर केलेली एक पोस्ट अत्यंत भावूक करणारी ठरली आहे. “एवढी वर्षे तुमचा जन्मदिवस अगदी आनंदाने, उत्साहाने आणि अभिमानाने साजरा केला… पण आज तुमचा हाच दिवस ‘जयंती’ म्हणून मानताना माझं मन आतून पार तुटून जातंय,” अशा शब्दांत सुनेत्रा पवार यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. हे कटू सत्य स्वीकारायला आजही मन तयार होत नसल्याचे सांगत त्यांनी अजितदादांच्या आठवणींना विनम्र प्रणाम केला आहे.

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मिळालेला भक्कम आधार आणि कठीण प्रसंगात पाठीवर पडणारी विश्वासाची थाप अचानक हरवून गेल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. “काळाने माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आधार एवढ्या लवकर हिरावून नेईल, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. आज तुमचा हा दिवस साजरा करताना काळीज पिळवटून निघतंय आणि डोळ्यांतील अश्रू थांबायचं नाव घेत नाहीत,” अशा काळीज पिळवटून टाकणाऱ्या ओळी त्यांनी लिहिल्या आहेत. दादा आज शारीरिकदृष्ट्या सोबत नसले, तरी त्यांचे विचार, शिस्त, लोकांप्रतीचा सेवाभाव आणि प्रेम प्रत्येक श्वासात कायम जिवंत राहील, असा विश्वासही त्यांनी या पोस्टद्वारे व्यक्त केला.

उल्लेखनीय आहे की, राज्याचे उपमुख्यमंत्री असताना २८ जानेवारी रोजी जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारासाठी बारामतीकडे येत असताना अजित पवार यांच्या चार्टर्ड विमानाला बारामती विमानतळाजवळ असलेल्या गोजुबावी गावाच्या हद्दीत भीषण अपघात झाला होता. विमान धावपट्टीवर कोसळून झालेल्या भीषण स्फोटात अजितदादांसह वैमानिक, केबिन क्रू आणि अंगरक्षकाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.













