पुणे : पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीपूर्वी महायुतीमधील जागावाटपाचा तिढा आता चांगलाच गडद झाला आहे. भाजपने जिल्ह्यात केवळ स्वतःच्या संख्याबळावर नव्हे, तर स्थानिक आघाड्यांची ताकद सोबत जोडत पुण्याच्या जागेवर थेट आणि मजबूत दावा ठोकला आहे. पुणे महापालिकेचे सभागृह नेते गणेश बीडकर यांनी भाजप आणि मित्र आघाड्यांकडे मिळून तब्बल ३३३ मतांचे भक्कम बळ असल्याचा दावा केला आहे. या बळाच्या जोरावर पुण्याची जागा भाजपलाच मिळावी, अशी थेट मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
या नव्या राजकीय गणितानुसार, पुणे जिल्ह्यात सध्या भाजपच सर्वात मोठा आणि प्रभावी पक्ष असल्याचा दावा स्थानिक नेत्यांकडून केला जात आहे. भाजपचे जिल्हाभरात एकूण ३०९ सदस्य निवडून आलेले आहेत. या बळामध्ये आता जिल्ह्यातील दोन प्रमुख स्थानिक आघाड्यांची मोठी भर पडली आहे. यामध्ये इंदापूरमधील ‘कृष्णा भीमा विकास आघाडी’चे ७ सदस्य आणि दौंडमधील ‘नागरिक हित संरक्षण मंडळ विकास आघाडी’च्या १७ सदस्यांचा समावेश आहे. या दोन्ही आघाड्यांची २४ मते आणि भाजपची स्वतःची ३०९ मते मिळून एकूण ३३३ मतांची वज्रमुठ तयार झाली असून, याच ‘३३३’ च्या मॅजिक फिगरवरून भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
वास्तविक पाहता, पुणे जिल्हा हा परंपरेने राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आणि प्रभावक्षेत्र मानला जातो. मात्र, बदललेल्या राजकीय समीकरणांमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाकडे सध्या जिल्ह्यात केवळ २९८ सदस्य असल्याचे भाजपच्या गोटातून सांगितले जात आहे. भाजपचे स्वतःचे ३०९ सदस्य हेच मुळात ‘राष्ट्रवादी’पेक्षा अधिक आहेत आणि त्यात आघाड्यांच्या २४ मतांची भर पडल्याने भाजपने तब्बल ३५ मतांची स्पष्ट आघाडी घेतल्याचा दावा केला आहे. या सांख्यिकीय वर्चस्वामुळे महायुतीच्या जागावाटपात पुण्याची जागा कोणत्याही परिस्थितीत भाजपलाच सुटावी, यासाठी पक्षाने वरिष्ठ पातळीवर जोरदार लॉबिंग सुरू केले आहे.
गणेश बीडकर यांनी मांडलेल्या या दाव्याचे मुख्य केंद्रस्थान पुणे महापालिकेतील भाजपची एकहाती ताकद हेच मानले जात आहे. महापालिकेतील एकूण १६५ सदस्यांपैकी तब्बल ११९ सदस्य एकट्या भाजपचे आहेत, तर त्या तुलनेत अजित पवार गटाकडे केवळ २७ सदस्य असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. शहरातील हे प्रचंड वर्चस्व आणि जिल्ह्यातील ३३३ मतांचे एकत्रित गणित यामुळे पुण्याची जागा अखेरीस भाजपच्याच पदरात पडेल, असा ठाम विश्वास भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला असून तसा सूर आता पक्षात आवळला जात आहे.
दरम्यान, गणेश बीडकर हे स्वतः या जागेसाठी इच्छुक असल्याने त्यांनी स्थानिक पातळीवर मोर्चेबांधणी आणि बैठकांचा सपाटा तीव्र केला आहे. ‘३३३’चा हा मोठा आकडा वरिष्ठ नेत्यांसमोर ठेवून भाजपने आता मित्रपक्षांवर राजकीय दबाव वाढवला आहे. हक्काची आणि वर्चस्व असलेली ही जागा जर मित्रपक्षाला सोडली, तर जमिनीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश जाईल, अशी भीतीही स्थानिक नेतृत्वाने व्यक्त केली आहे. त्यामुळे आता भाजपच्या या ‘३३३ च्या चक्रव्यूहा’ला छेद देत अजित पवार गट ही जागा स्वतःकडे खेचून आणण्यात यशस्वी ठरतो की महायुतीचे वरिष्ठ नेते यावर वेगळा तोडगा काढतात, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुणे पालिकेत नीट पेपरफुटीवरून विरोधकांचा जोरदार राडा, सभागृहात घोषणाबाजी अन् गोंधळ
-संतापजनक! ‘मुलगा होत नाही’ म्हणून पत्नीच्या गुप्तांगावर ओतलं ॲसिड अन् १५ दिवस ठेवलं डांबून














