पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीने यंदा चांगलेच राजकीय वळण घेतल्याचे चित्र समोर आले आहे. बुद्धिजीवी वर्गाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या साहित्य क्षेत्रातील ही निवडणूक सुसंस्कृत, वैचारिक आणि संयमित पद्धतीने होणे अपेक्षित असताना, पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत मात्र याच्या अगदी उलट चित्र पाहायला मिळाले.
परिवर्तन उत्कर्ष आघाडीच्या वतीने विरोधी पॅनलकडून सुरू असलेल्या कथित आक्षेपार्ह घडामोडी उघड करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेतच चांगलेच वातावरण तापले. पत्रकारांनी विचारलेल्या थेट प्रश्नांमुळे आघाडीचे प्रमुख विनोद कुलकर्णी यांचा संयम ढासळला आणि त्यांनी अरेरावीची भाषा वापरल्याचे दिसून आले. यामुळे “साहित्यिकांच्या तोंडी राजकारण्यांची भाषा” अशी जोरदार चर्चा साहित्य वर्तुळात रंगू लागली आहे.
या पत्रकार परिषदेला विनोद कुलकर्णी यांच्यासह मिलिंद जोशी, सतीश देसाई, सुनीतराजे आणि राजीव बर्वे उपस्थित होते. यावेळी कुलकर्णी यांनी काही विशिष्ट संघटना व संस्थांकडून महाराष्ट्र साहित्य परिषदेत शिरकाव करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप केला. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा गैरवापर करून बदनामी केली जात असल्याचा दावा करत त्यांनी ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे कुलकर्णी यांनी म्हटले आहे”.
याचवेळी भाजप नेते राजेश पांडे हे मुख्यमंत्र्यांचे नाव पुढे करून महाराष्ट्र साहित्य परिषद ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा थेट आरोप विनोद कुलकर्णी यांनी केला. राजेश पांडे यांनी या आरोपांवर आपली भूमिका स्पष्ट करावी, तसेच सरकारी यंत्रणांचा गैरवापर झाला असल्यास निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाई करावी, अशी मागणीही परिवर्तन उत्कर्ष आघाडीने केली आहे.
एकीकडे साहित्य, विचार आणि संस्कृतीची परंपरा जपण्याची जबाबदारी असलेल्या संस्थेच्या निवडणुकीत वाढता राजकीय हस्तक्षेप, तर दुसरीकडे पत्रकार परिषदेत दिसून आलेली अरेरावीची भाषा यामुळे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीभोवती वादळ निर्माण झाले असून, येत्या काळात हा वाद आणखी चिघळण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-पुणे पोलिस दलात २५ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या; जाणून घ्या तुमच्या भागातील नवे निरीक्षक!
-५० तोळे सोनं अन् ३५ लाख कॅश हुंडा देऊनही इंजिनियर विवाहितेची छळ केला, गर्भपात केला, शेवटी….
-फळांचा राजा पुण्याच्या बाजारात दाखल! एका पेटीची किंमत तब्बल १५ हजार














