पुणे : पुणे स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून विक्रम काकडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. काकडे यांचे नाव निश्चित झाल्यानंतर पक्षांतर्गत गोटात चर्चां आणि नाराजीला उधाण आले आहे. पक्षात वर्षानुवर्षे काम करणाऱ्या नेत्यांना डावलून थेट नव्या चेहऱ्याला संधी दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे.
राष्ट्रवादीमध्ये इच्छुकांच्या यादीत माजी आमदार सुनील टिंगरे, विलास लांडे, दीपक मानकर, संजोग वाघीरे, योगेश बहल, रणजीत शिवतारे यांसारखी अनेक अनुभवी आणि स्थानिक पातळीवर मजबूत नेत्यांची नावे चर्चेत होती. मात्र अंतिम क्षणी विक्रम काकडे यांच्या नावाची घोषणा झाल्याने राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
विशेष म्हणजे, पक्षाचे कारभारी म्हणून पुढे आलेले खासदार पार्थ पवार यांचे ‘खास’ मित्र असल्यानेच काकडे यांना उमेदवारी दिल्याची चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळे “पक्षनिष्ठेपेक्षा कारभाऱ्यांची जवळीक महत्त्वाची झाली का?”, असा सवाल कार्यकर्त्यांच्या चर्चेतून पुढे येताना दिसत आहे.
“विक्रम काकडे यांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमके योगदान काय?” अशी उघडपणे चर्चा सुरू असल्याचे दिसत आहे. अनेक वर्षे पक्षासाठी राबणाऱ्यांना प्रतीक्षा आणि नव्या चेहऱ्याला थेट संधी, यामुळे संघटनात्मक पातळीवर अस्वस्थता वाढली आहे. “दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आज असते तर त्यांनी पक्षातील एकनिष्ठ कार्यकर्त्यालाच संधी दिली असती” अशी भावना व्यक्त केली जात आहे.
विक्रम काकडे यांना उमेदवारी मिळाली असली तरी खरी कसोटी मतदानाच्या दिवशी लागणार आहे. संघटनेतील नाराजी मतपेटीत दिसते की पक्ष नेतृत्व सर्वांना एकत्र आणण्यात यशस्वी ठरते, हा पाहणे महत्त्वाचे असणार आहे. सध्यातरी पुणे विधान परिषद निवडणुकीत उमेदवारीपेक्षा नाराजीची चर्चा जास्त रंगतेय हे मात्र नक्की.
महत्वाच्या बातम्या-
-विषारी दारूने पुण्यात हाहकार! शिंदेंची शिवसेना झाली आक्रमक, पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन














