पुणे : महाज्योती (महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था) च्या प्रशासनिक कामकाजामुळे पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना वारंवार नागपूरला जावे लागत आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. याच संदर्भात पुणे जिल्हाध्यक्ष वैभव सोलनकर यांनी महाज्योती संचालक तसेच मुख्यमंत्री यांना पत्र पाठवून पुणे येथील महाज्योतीचे विभागीय कार्यालय पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची मागणी केली आहे.
विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, सर्व प्रशासकीय प्रक्रिया, पीएचडी कागदपत्रांची तपासणी, शिष्यवृत्तीशी संबंधित काम आणि इतर विद्यार्थी सेवा फक्त नागपूर मुख्य कार्यालयातूनच चालवल्या जात असल्याने त्यांना वारंवार नागपूरला जावे लागत आहे.
यामुळे त्यांचा वेळ, पैसा आणि मानसिक-शारीरिक श्रम मोठ्या प्रमाणावर खर्च होत आहे.
पुण्यात प्रक्रिया सुरू झाल्यास फक्त पुणेच नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा वेळ, पैसा आणि अनावश्यक प्रवास वाचेल. विभागीय स्तरावर कामकाज वेगाने होईल, नागपूर कार्यालयावरील अनावश्यक भार कमी होईल, महाज्योतीवरील विद्यार्थ्यांचा विश्वास अधिक दृढ होईल आणि विभागीय सेवा सुचारूपणे उपलब्ध होतील.
“महाज्योतीतर्फे राज्यातील प्रत्येक विभागातील विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी विभागीय कार्यालयांना बळकटी देणे अत्यावश्यक आहे. महाज्योतीने हा विषय गांभीर्याने घेऊन पुणे विभागीय कार्यालयात सर्व विद्यार्थीविषयक कामकाज तात्काळ सुरू करावे”, असं वैभव सोलनकर म्हणाले आहेत.
महाज्योतीमध्ये संवादाचा अभाव
महाज्योतीचे बहुतेक दूरध्वनी कॉल उचलले जात नाहीत. “WhatsApp वर संदेश पाठवा” असे सांगून विद्यार्थ्यांना टाळाटाळ केली जाते.
WhatsApp वर पाठवलेल्या तक्रारींनाही कोणताही प्रतिसाद मिळत नाही, त्यामुळे संवाद व्यवस्था पूर्णपणे ठप्प झाल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे उपलब्ध फोन व WhatsApp सेवा अप्रभावी ठरत असून त्यावर खर्च होणारा निधी वाया जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. यावेळी उपस्थित भाजप युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष वैभव सोलनकर,सरचिटणीस स्वप्नील मोडक,अमर बुदगुडे,ओंकार कड्डे,रसिका सणस,सुशांत लोखंडे,जीवन साखरे आदी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या-
-महापालिका निवडणुका कधी होणार? सुप्रीम कोर्टात आज नेमकं काय घडलं वाचा सविस्तर…
-भाजप नेत्याच्या धमकीमुळे प्रकल्प पडला बंद, आता महापालिकेला २ कोटी ८१ लाखांचा भुर्दंड!
-रस्त्यावर १० लाख रुपयांची बॅग सापडली, अन्…, कचरा गोळा करणाऱ्या अंजूताईंचा प्रामाणिकपणा चर्चेत














