पुणे : भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना वाढत असताना सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना कडक इशारा दिला. गेल्या पाच वर्षांत नियमांच्या अंमलबजावणीसाठी कोणतीही ठोस पावले न उचलल्याबद्दल न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. न्यायमूर्ती विक्रम नाथ, संदीप मेहता आणि एन. व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठाने म्हटले की, भटक्या कुत्र्याने चावा घेतल्यास संबंधित घटनेत मोठी भरपाई देण्याचे आदेश दिले जातील.
न्यायालयाने विशेषतः श्वानप्रेमींवर टीका करत म्हटले, “तुम्हाला कुत्र्यांवर इतके प्रेम आहे तर त्यांना घरी का घेऊन जात नाही? ही भटकी कुत्री सतत इकडे-तिकडे फिरत राहतात, लोकांचा चावा घेतात आणि लोक घाबरतात.” न्यायमूर्ती मेहता यांनी न्या. नाथ यांच्या मताशी सहमती दर्शवत म्हटले की, नऊ वर्षांच्या मुलावर हल्ला होत असताना श्वानप्रेमी संघटनांना जबाबदार धरायचे का? समस्येबाबत डोळे झाकून गप्प बसावे अशी तुमची इच्छा आहे का?
७ नोव्हेंबर २०२५ रोजी न्यायालयाने संबंधित अधिकाऱ्यांना सार्वजनिक ठिकाणी आणि रस्त्यांवर फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश दिले होते. याला विरोध करणाऱ्या याचिकांवर ही सुनावणी सुरू आहे. न्यायालयाने वकिलांना आवाहन केले की, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी निश्चित करू द्या. राज्ये आणि केंद्र सरकारकडे याबाबत योजना आहे का, हे पडताळू द्या.
न्यायालयाने खेद व्यक्त केला की, काही कार्यकर्ते आणि सेवाभावी संस्थांच्या हस्तक्षेपामुळे राज्ये व केंद्र सरकारचे म्हणणे ऐकून घेता आले नाही. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग वाढत असल्याने ही समस्या अधिक गंभीर झाली आहे. न्यायालयाने राज्यांना डोळे झाकून बसण्याची परवानगी नसल्याचे स्पष्ट केले.
या सुनावणीनंतर पुणे आणि राज्यातील भटक्या कुत्र्यांच्या समस्येकडे पुन्हा लक्ष वेधले गेले आहे. न्यायालयाच्या कठोर भूमिकेमुळे स्थानिक स्वराज्य संस्था आणि श्वानप्रेमी संघटनांवर दबाव वाढला आहे. भविष्यात भरपाईचे मोठे आदेश दिले जाऊ शकतात, अशी भीती व्यक्त होत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात मतदारांना ‘चांदीच्या वाट्या वाटपाचा आरोप; या प्रभागात राजकीय वातावरण तापले
-कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळे प्रभाग २५ मध्ये मोठा विजय होणार- राघवेंद्र बाप्पू मानकर
-६० हजार मतदार, तीनदा थेट भेट; गणेश बिडकरांच्या २० लाख पावलांची राजकीय वारी
-ज्येष्ठ नागरिकांसाठी सुसज्ज रुग्णालय उभारणार- राघवेंद्र बाप्पू मानकर
-प्रभाग २२ मध्ये भाजपची ताकद वाढली; सादिक भाऊ लुकडेंचा भाजपमध्ये प्रवेश














