पुणे : शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी महत्त्वाची देखभाल व दुरुस्ती कामे यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली आहेत. एमएसईबीसीएलच्या विद्युत वहन प्रणालीवरील मोठ्या कामांसह खडकवासला ते वारजे जलशुद्धीकरण प्रकल्प (WTP) लाईनवरील १६०० मिमी मुख्य आयसोलेशन व्हॉल्व्ह बदलण्यात आला आहे. मागील पाच वर्षांपासून निकामी असलेला हा व्हॉल्व्ह बदलल्याने आता संपूर्ण प्रणाली बंद न करता स्वतंत्रपणे देखभाल कामे करता येणार आहेत.
तसेच खडकवासला धरणावरील ३००० मिमी व्हॉल्व्हचेही यशस्वीरीत्या नूतनीकरण करण्यात आले आहे. या कामामुळे भविष्यात मोठ्या बिघाडाची शक्यता टळणार आहे. पर्वती येथील जुन्या व नवीन जलशुद्धीकरण प्रकल्पांवर तसेच भामा-आसखेड प्रकल्पावर इनलेट वॉटर मीटर बसविण्यात आल्याने पाण्याचे अचूक मोजमाप व गळतीचे निरीक्षण शक्य होणार आहे. विविध प्रकल्पांमध्ये एकूण ४५ नागरी व विद्युत देखभाल कामे पूर्ण करण्यात आली आहेत.
सध्या टप्प्याटप्प्याने सर्व जलशुद्धीकरण प्रकल्प आणि पंपिंग स्टेशन सुरू करण्यात येत असून, पर्वती नवीन प्रकल्प सुरू होणे बाकी आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे २००० मिमी मीटर बसविण्याचे काम विलंबित झाले असले तरी ते दुपारपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सिंचन विभागाच्या सहकार्याने कालव्यातून सुमारे १७५ एमएलडी पाणी उचलण्याचे काम सुरू आहे.
पाणीपुरवठा सकाळी सुमारे ११.३० वाजेपर्यंत सुरू होण्याची शक्यता असली तरी औंध, कोथरूड, एरंडवणे, भवानी पेठ आणि नाना पेठ या भागांत कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता आहे. संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा पूर्णपणे पूर्ववत होण्यासाठी सुमारे चार तासांचा विलंब होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-विधानपरिषदेसाठी भाजपकडून नावांची शिफारस; अंतिम निर्णयावर दिल्लीची मोहर बाकी
-मावळ बाजार समिती वादाला राजकीय रंग; निर्णय आता मंत्रालयाच्या कोर्टात
-पुणेकरांसाठी म्हाडाची मोठी संधी; २९५ घरांसाठी ‘पहिले येणाऱ्यास प्राधान्य’ योजना जाहीर
-डेक्कन नदीपात्रातील खून प्रकरण उघड; पैशांच्या वादातून तरुणाला संपवलं














