पुणे : राज्याच्या राजकारणात विधान परिषद आमदारांच्या निवडीची चर्चा जोरात सुरू आहे. यावेळी भाजपला पाच तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दोन आमदार निवडता येणार आहेत. या दोन जागांसाठी पक्षात अनेक इच्छुक उमेदवार सक्रिय आहेत. विद्यमान उपसभापती नीलम गोऱ्हे यांचा कार्यकाल संपुष्टात येत असल्याने त्यांना पुन्हा संधी मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवले आहे. त्यात नीलम गोऱ्हे यांना पुन्हा संधी न देता, त्यांच्या जागी बिग बॉस मधील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व अभिजीत बिचुकले यांना विधान परिषदेची संधी द्यावी, अशी मागणी केली आहे. तृप्ती देसाईंच्या या पत्राची राजकीय वर्तुळात चांगली चर्चा सुरू झाली आहे.
पत्रात तृप्ती देसाई यांनी म्हटले आहे की, नीलम गोऱ्हे अनेक वर्षे विधान परिषदेवर आहेत, मात्र त्यांनी पक्ष आणि संघटनेचा विस्तार करण्यासाठी विशेष प्रयत्न केलेले दिसत नाहीत. अनेक महिलांना नेतृत्वाची संधी देता येत असताना त्यांनी स्वतः अनेक पदे भूषवली आहेत. पुणे परिसरातही पक्षाला नगरसेवकसुद्धा निवडून आणता आलेला नाही. शिवाय त्यांचे वय ७० वर्षांपेक्षा अधिक झाले आहे.
त्यामुळे संघटनेच्या विस्तारासाठी नवीन आणि प्रभावी नेतृत्वाची गरज असल्याचे देसाई यांनी नमूद केले. त्यांनी पुढे म्हटले की, काम न करणाऱ्या व्यक्तीला संधी देण्यापेक्षा महाराष्ट्रातील लोकप्रिय व्यक्तिमत्त्व डॉ. अभिजीत बिचुकले यांना पक्षात घेऊन त्यांना विधान परिषदेवर संधी द्यावी.
अभिजीत बिचुकले विधान परिषदेवर आल्यास कलाकारांसाठी आवाज उठवू शकतील तसेच इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका घेऊ शकतील. त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे आणि लोकप्रियतेमुळे पक्षाला राज्यभर व देशभर फायदा होईल. ते हिंदुत्ववादी विचारसरणीचे असल्याने पक्षाच्या विचारधारेत सहज बसतील आणि तरुण नेतृत्व म्हणून संधी सार्थ ठरवतील, असा विश्वास तृप्ती देसाई यांनी पत्रात व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-विधानपरिषदेसाठी भाजपकडून नावांची शिफारस; अंतिम निर्णयावर दिल्लीची मोहर बाकी
-मावळ बाजार समिती वादाला राजकीय रंग; निर्णय आता मंत्रालयाच्या कोर्टात
-पुणेकरांसाठी म्हाडाची मोठी संधी; २९५ घरांसाठी ‘पहिले येणाऱ्यास प्राधान्य’ योजना जाहीर














