पुणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. पक्षाचे नाव व धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला मिळाले. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील राजकीय वैर टोकाला पोहोचले आहे. शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर दोन्ही गट एकत्र येतील येणे कठीण होते. मात्र, पुणे जिल्ह्यातील चाकण नगरपरिषद निवडणुकीत हे दोन्ही गट एकत्र आल्याने राजकारणात कोणीच कधी कोणाचा कायमचा शत्रू किंवा कायमचा मित्र नसतो हे सिद्ध झाले आहे.
चाकण नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी शिंदे गटाची उमेदवार मनीषा सुरेश गोरे यांचा अर्ज दाखल करताना ठाकरे गट आणि शिंदे गटाची युती पहायला मिळाली आहे. खेडचे ठाकरे गटाचे आमदार बाबाजी काळे आणि शिरूरचे शिंदे गटाचे आमदार शरद सोनवणे हे दोन्ही नेते सोबत होते. ही घटना राज्याच्या राजकारणात खळबळ निर्माण करणारी ठरली असून, येणाऱ्या काळात राजकीय समीकरणे बदलणार का, याची चर्चा सुरू झाली आहे.
ठाकरे गटाचे आमदार बाबाजी काळे यांनी स्पष्ट केले की, खेड-आळंदीचे दिवंगत आमदार सुरेश गोरे यांच्या निधनानंतर ही पहिली निवडणूक आहे. त्यांच्या पत्नी मनीषा गोरे यांना आदरांजली म्हणून राजकारण बाजूला ठेवून पाठिंबा दिला. ही युती नसून फक्त या पदापुरती मर्यादित आहे. उद्धव ठाकरे आणि सचिन अहिर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
तालुक्यातील राजगुरुनगर आणि आळंदी येथे ठाकरे गट स्वबळावर लढणार असल्याचे काळे यांनी सांगितले. चाकणमधील ही युती सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली आहे. राजकीय पंडितांच्या भुवया उंचावल्या असून, भविष्यातील राजकीय घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-नवले पूल अपघात रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना; केंद्रीय मंत्री मोहोळांच्या बैठकीत जबाबदारी निश्चित
-शरद पवारांच्या राष्ट्रवादीत इच्छुकांची झुंबड; पहिल्याच दिवशी उमेदवारी अर्ज संपले
-मावळमधील कट्टर विरोधकांचं लोणावळ्यात जमलं; वडगावमध्ये फिस्कटलं, राष्ट्रवादीकडून कोणाला उमेदवारी?














