पुणे : शिस्तबद्ध पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाजपमधील अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर आला आहे. पुण्यातील प्रभाग क्रमांक २२ च्या दोन महिला नगरसेविकांमधील वाद आता पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. नगरसेविका अर्चना पाटील आणि मृणाल कांबळे यांच्यातील शीतयुद्ध आता उघड संघर्षात रूपांतरित झाले असून, एकमेकींवर गंभीर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत.
नगरसेविका अर्चना पाटील यांनी आपलीच सहकारी मृणाल कांबळे यांच्याविरोधात पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली आहे. कांबळे यांनी आपले ‘मॉर्फ केलेले’ (छेडछाड केलेले) व्हिडिओ सोशल मीडियावर पसरवून बदनामी केल्याचा खळबळजनक आरोप पाटील यांनी केला आहे. विशेष म्हणजे, पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतील विधाने जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीने पसरवून आपली प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाल्याचे पाटील यांचे म्हणणे आहे.
हा वाद केवळ स्थानिक स्तरावर मर्यादित न राहता आता थेट राज्याच्या राजधानीपर्यंत पोहोचला आहे. अर्चना पाटील यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून न्यायाची मागणी केली आहे. पोलिसात तक्रार करण्यासोबतच त्यांनी मुख्यमंत्र्यांना या विषयात तातडीने हस्तक्षेप करण्याची विनंती केली असून, पक्षांतर्गत वाद आता थेट सत्तेच्या सर्वोच्च केंद्रापर्यंत पोहोचल्याने भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.
दुसरीकडे, मृणाल कांबळे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत पलटवार केला आहे. अर्चना पाटील या केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि प्रभागातील विकासकामांत अडथळा आणण्यासाठी असे ‘पब्लिसिटी स्टंट’ करत असल्याचा दावा कांबळे यांनी केला आहे. यापूर्वीही भाजपच्या दोन नगरसेविकांमध्ये ‘टक्केवारी’वरून राडा झाला होता, त्यानंतर आता हा नवा वाद समोर आल्याने पुणे भाजपमधील गटबाजी पुन्हा एकदा उघड झाली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-टुरिस्ट व्हिसावर भारतात आले अन् धर्मप्रसार सुरू! पुण्यात ३ अमेरिकन नागरिकांना ‘लीव्ह इंडिया’ नोटीस
-‘नीलम गोऱ्हेंऐवजी अभिजीत बिचुकले विधान परिषदेवर पाठवा’, तृप्ती देसाईंची एकनाथ शिंदेंकडे खास मागणी














