पुणे : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू असतानाच ओबीसी आरक्षणावर सुप्रीम कोर्टात आज महत्त्वाची सुनावणी पार पडली. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा झाली. या प्रकरणात ५० टक्के आरक्षण मर्यादेच्या पालनाची मागणी करण्यात आली आहे. “तुम्ही घटनापीठाच्या निर्णयापेक्षा पुढे जाऊ नका, सुप्रीम कोर्टाच्या अधिकारांची परीक्षा घेऊ नका,” असा कडक इशारा न्यायालयाने दिला.
‘५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडता येणार नाही’, असं न्यायालयाने राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाला स्पष्ट शब्दात सुनावलं आहे. या सुनावणीमुळे राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि त्यातील आरक्षणाची टक्केवारी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. न्यायालयाने आरक्षणाची मर्यादा ओलांडता येणार नाही, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
न्यायालयाने म्हटले की, जर सरकार आणि निवडणूक आयोग ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न करतील तर न्यायालय थेट निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करेल. त्यामुळे आता राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाने आपली भूमिका ठरवून येत्या १९ नोव्हेंबर रोजी पुन्हा सुनावणीत मांडावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
वकील देवदत्त पालोदकर यांनी सांगितले की, ‘न्यायालयाने अतिशय स्पष्टपणे सांगितले आहे की, ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देता येणार नाही’. तर वकील अमोल करांडे यांनी नमूद केले की, “निवडणुका घ्या, पण मर्यादा ओलांडू नका. प्रक्रियेत अडथळा आणू नका, असे न्यायालयाने बजावले. घटनापीठाच्या निर्णयाच्या पलीकडे जाता येणार नाही, हे पुन्हा एकदा ठसवण्यात आले आहे.”
सध्या राज्यातील ३० ते ४० नगरपालिका-नगरपरिषदांमध्ये आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे, तर महानगरपालिकांवर याचा फारसा परिणाम होणार नाही. १९ नोव्हेंबरची सुनावणी आणि त्यानंतरचा न्यायालयीन निर्णय राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेचे भवितव्य ठरवणारा ठरेल.
महत्वाच्या बातम्या-
-प्रभाग २७ ची गणितं बदलणार? हेमंत बागुलांच्या संभाव्य उमेदवारीने चर्चेला उधाण!
-राजकारणात मोठी खळबळ; शिवसेनेच्या दोन्ही गटाची युती
-नवले पूल अपघात रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना; केंद्रीय मंत्री मोहोळांच्या बैठकीत जबाबदारी निश्चित
-शरद पवारांच्या राष्ट्रवादीत इच्छुकांची झुंबड; पहिल्याच दिवशी उमेदवारी अर्ज संपले
-मावळमधील कट्टर विरोधकांचं लोणावळ्यात जमलं; वडगावमध्ये फिस्कटलं, राष्ट्रवादीकडून कोणाला उमेदवारी?














