पुणे : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती विमानतळावरील भीषण विमान अपघात प्रकरणात आमदार रोहित पवार यांनी VSR व्हेंचर्स आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालय विरोधात गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास नकार दिला. पोलिसांनी सांगितले की, या अपघाताबाबत बारामती तालुका पोलीस ठाण्यात २८ जानेवारी रोजी अपघाती मृत्यूची नोंद झाली असून, सखोल तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (CID) पुणे यांच्यामार्फत सुरू आहे. त्यामुळे रोहित पवार यांचा तक्रार अर्ज पुढील कार्यवाहीसाठी राज्य CID कडे पाठवण्यात आला आहे.
दुसरीकडे, मरीन ड्राईव्ह पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास नकार दिल्यानंतर आज (२६ फेब्रुवारी) रोहित पवार बारामती पोलिस ठाण्यास हजारो समर्थकांसह पोहोचले. सोबत वकिलांची फौजही आहे. रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार आणि युगेंद्र पवार यांच्यासह मोठ्या संख्येने समर्थक उपस्थित होते. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास विलंब करत असल्याने बारामतीकरांचा आक्रोश पोलिस ठाण्यात दिसून आला. “मेलो तरी न्याय देत नाहीत, न्याय मागायचा तरी कुणाकडं?” अशी हताश प्रतिक्रिया समर्थकांनी दिली.
समर्थकांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. “राजकारण इतकं खराब केलंय की माणसात माणूस ठेवला नाही,” अशा शब्दांत समर्थकांनी मुख्यमंत्र्यांवर राग व्यक्त केला. “अजितदादांना न्याय मिळाला पाहिजे, देहातला आत्मा निघून गेलाय, आमच्या देवाला न्याय मिळाला पाहिजे,” अशी भावना समर्थकांनी व्यक्त केली.
रोहित पवार यांनी आरोप केला की, DGCA व्हीएसआर कंपनीला ‘क्लिन चिट’ देण्याचा प्रयत्न करत आहे. विमानाची उड्डाणयोग्यता तपासणे ही DGCA ची जबाबदारी असून, या प्रकरणाच्या तपासात गुंतलेल्या DGCA अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. DGCA ने व्हीएसआरच्या पाच विमानांना उड्डाणबंदी घातली होती, ज्याचा अर्थ ही कंपनी अपघातास जबाबदार होती, असा दावा रोहित पवार यांनी केला.
खासदार सुप्रिया सुळे यांनी मागणी केली की, पुढील आठवड्यात संसदेचे अधिवेशन सुरू झाल्यावर केंद्र सरकारने अजित पवार यांचा अपघात आणि झारखंडमधील एअर ॲम्ब्युलन्स अपघात या दोन्ही घटनांवर अधिकृत विधान करावे. या अपघातांमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली असून, भविष्यात अपघातमुक्त हवाई प्रवास सुनिश्चित करण्यासाठी सखोल तपास आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. DGCA ने व्हीएसआर व्हेंचर्सची विमाने जमिनीवर उतरवण्याच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले, मात्र ज्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे किंवा प्रक्रियेचे उल्लंघन केल्यामुळे ही परिस्थिती ओढवली, त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी सुळे यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुणे महापालिकेत स्वीकृत नगरसेवक कोण होणार? मुहूर्त ठरला अन् इच्छुकांची जोरदार लॉबिंग सुरू
-‘आयुक्त साहेब, माझ्या मानहानीचा खुलासा करा’ राज्यमंत्री माधुरी मिसाळ आक्रमक, सुनावले खडेबोल
-औंध-बोपोडी प्रभागातील महत्त्वाच्या प्रकल्पांना आयुक्तांची भेट; कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश














