पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत नाराजीनाट्याने आता एक वेगळंच वळण घेतलं आहे. शनिवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास खासदार पार्थ पवार यांनी कोणालाही सुगावा लागू न देता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. अजित पवारांच्या निधनानंतर पक्ष संघटनेत सक्रिय झालेले पार्थ पवार हे कुणाही नेत्याला सोबत न घेता एकटेच फडणवीसांना भेटायला गेल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. या बंद दाराआड झालेल्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, याचा तपशील अद्याप गुलदस्त्यात असला तरी ही भेट राष्ट्रवादीतील मोठ्या बदलांचे संकेत मानली जात आहे.
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुनेत्रा पवार विरुद्ध प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे असा छुपा संघर्ष सुरू असल्याची चर्चा रंगली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीतून पटेल आणि तटकरे यांची नावे वगळली गेल्याने खळबळ उडाली होती. राष्ट्रवादीने याला ‘प्रिंटिंग मिस्टेक’ म्हटले असले तरी, ही खरोखरच तांत्रिक चूक होती की सुनेत्रा पवारांनी या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांना दिलेला हा जाणीवपूर्वक इशारा होता, यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. या वादात सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी बाळगलेले मौन अनेक गोष्टी अधोरेखित करत आहे.

या सर्व घडामोडीत आमदार रोहित पवार यांनी प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर शब्दांचे आसूड ओढले आहेत. अजित पवारांनी शेवटच्या काळात या दोन्ही नेत्यांबद्दल नाराजी व्यक्त केली होती, असा दावा करत रोहित पवारांनी थेट आरोप केला आहे की, तटकरे आणि पटेल हे २२ आमदारांना फोडून भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत. रोहित पवारांच्या या सनसनाटी आरोपामुळे पक्षात उभी फूट पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा संभ्रम निर्माण झाला आहे.
पार्थ पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या या गुप्त भेटीनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सत्तासंघर्षाचा दुसरा अंक सुरू होणार का? प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांना खरोखरच साईडलाईन केले जाणार का? आणि २२ आमदारांच्या बंडाच्या दाव्यात किती तथ्य आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे येत्या काही दिवसांत मिळतील. मात्र, तूर्तास पार्थ पवारांच्या या एका भेटीने महायुती आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात मोठी अस्वस्थता पसरली आहे, हे मात्र नक्की.
महत्वाच्या बातम्या-
-पंतप्रधानांचे नाव विचारले अन् बोलतीच बंद! बुधवार पेठेत मध्यरात्री पोलिसांच्या कारवाईचा धडाका
-सूर, ताल आणि कौतुकाचा वर्षाव! ‘पुणे आयडॉल २०२६’चा महाअंतिम सोहळा दिमाखात संपन्न
-राष्ट्रवादीत मोठी खळबळ; महिला आयोग अध्यक्षपदावरुन रणकंदन, अध्यक्षपदाची मोठी चर्चा
-पुण्यात सुनेला संपवलं, अन् घराला कुलूप लावून फरार झाला, ८ दिवसांनी पोलिसांनी ठोकल्या बेड्या














