पिंपरी-चिंचवड : महापालिका निवडणुकीला अवघे दहा दिवस शिल्लक असताना भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांना थेट तंबी दिली. “पॅनेलच्या बाहेर जाऊन कोणी प्रचार करू नये. प्रत्येकाने पॅनेलमध्ये प्रचार करावा. शायनिंग मारत बसू नये. चारही उमेदवार निवडून आले पाहिजेत. सेटिंग करू नका,” असे स्पष्ट आदेश रविंद्र चव्हाण यांनी दिले आहेत. प्रभाग क्रमांक २८ (पिंपळेसौदागर) मधून काटे निवडणूक लढवत असल्याने ही तंबी विशेष महत्त्वाची मानली जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे प्रचारप्रमुख नाना काटे यांच्या नेतृत्वाखाली त्या प्रभागात पॅनेल आहे. शत्रुघ्न आणि नाना काटे यांनी यंदाही समोरासमोर लढण्याचे टाळले आहे. या पार्श्वभूमीवर चव्हाण यांची तंबी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चेचा विषय ठरली आहे. पक्षांतर्गत शिस्त आणि पॅनेल विजयावर भर देण्याचा हा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.
निगडी येथे बोलताना चव्हाण यांनी भाजपची विचारधारा पारदर्शकतेची असल्याचे सांगितले. “वर्षानुवर्षांचा कारभार जनतेने पाहिला आहे. पिंपरी-चिंचवडला स्मार्ट सिटीमध्ये समावेश, पायाभूत सुविधांमध्ये बदल, वाहतूक कोंडी दूर करणे – हे केंद्र आणि राज्य सरकारचे योगदान आहे,” असे ते म्हणाले. विकास आणि हिंदुत्व ही दोन्ही चाके एकत्र असल्याचा दावा त्यांनी केला.
“हिंदू आहे हे म्हणायला अंगात रग लागते, ती भाजपशिवाय कोणत्याही पक्षात नाही,” असे ठणकावून सांगत चव्हाण यांनी विरोधकांना लक्ष्य केले. मतांच्या राजकारणापेक्षा विचारधारेवर चालणारा पक्ष असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. रविंद्र चव्हाण यांच्या तंबीने पिंपरी-चिंचवड भाजपमध्ये शिस्त आणण्याचा प्रयत्न दिसतो. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात पक्षांतर्गत समन्वय आणि पॅनेल विजयावर भर देण्यात येत आहे. या वक्तव्याने राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या-
-विद्यार्थ्यांसाठी कटिबद्ध आबा बागुल: प्रभाग ३६ मध्ये ई-लर्निंग स्कूलची ग्वाही
-नाही होय म्हणता म्हणता अखेर जुळलं! पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, भाजप-शिंदेसेनेत मात्र फाटलं?
-अजित पवारांना पिंपरी महापालिकेत धक्क्यावर धक्के, भाजपचा दुसराही उमेदवार बिनविरोध निवडून
-भाजपच्या तिकिटावर कोट्यवधींच्या मालमत्तेचे उमेदवार; पठारे कुटुंब सर्वात श्रीमंत














