पुणे : पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचनेवरील हरकतींची प्रक्रिया पूर्ण झाली असून आता अंतिम प्रभाग रचनेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, भाजपसह सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला वेग दिला आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हडपसरमधील ‘जनसंवाद दौऱ्या’ने निवडणुकीचे वातावरण अधिक रंगतदार होताना दिसत आहे. या माध्यमातून नागरिकांच्या अडचणी सोडवण्याचा दावा होत असला, तरी प्रत्यक्षात ही महापालिकेच्या साखरपेरणीचीच सुरुवात असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
पुणे शहर व जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या दोन दशकांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा प्रभाव प्रचंड होता. 2017 पर्यंत महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची सत्ता, तर अजित पवार हे उपनगरांमधील बालेकिल्ल्यांवर ठाम पकड ठेवून होते. मात्र 2014 नंतर भाजपने राज्यात सत्ता मिळवली आणि त्याचा थेट परिणाम पुणे शहराच्या राजकीय समीकरणावर झाला.. 2017 मध्ये झालेल्या पुणे महापालिका निवडणुकीत भाजपने पहिल्यांदाच एकहाती सत्ता मिळवत ऐतिहासिक विजय नोंदवला. हा विजय फक्त स्थानिक पातळीवर नव्हता, तर राज्यातील भाजपच्या वाढत्या पकडीचे प्रतिक होता.
भाजपचा पुण्यात वाढलेला प्रभाव
2014 पासून राज्यातील सत्ता भाजपकडे आहे. महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांचा अपवाद वगळता गेल्या दहा वर्षांत भाजपने राज्यात आपली पकड कायम ठेवली. या माध्यमातून पुणे शहरात विकासकामे, पायाभूत सुविधा, मेट्रो, रस्ते, उड्डाणपूल अशा प्रकल्पांद्वारे भाजपने आपली ताकद वाढवली. पुणे शहरातील मध्यवर्ती मतदारसंघ जसे की पर्वती, कसबा, शिवाजीनगर, कोथरूड या भागात भाजपने आपला प्रभाव वाढवला असून या भागातील बहुतांश नगरसेवक त्यांच्याकडेच आहेत.
अजित पवारांची खरी ताकद पुण्यातील उपनगर भागात आहे. हडपसर, वडगाव शेरी, खडकवासला या भागातून 2017 मध्ये राष्ट्रवादीचे मोठ्या संख्येने नगरसेवक निवडून आले होते. 42 नगरसेवकांपैकी बहुतांश उपनगरातूनच आले होते. पुण्यातील मध्यवर्ती भागात राष्ट्रवादीचे फारसे अस्तित्व नाही. पर्वती, कसबा, शिवाजीनगर, कोथरूड येथे बोटावर मोजण्याएवढेच नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे अजितदादांनी आगामी निवडणुकीत पुन्हा उपनगरांवरच लक्ष केंद्रित केले आहे.
मोर्चाबांधणीची नवी रणनीती : जनसंवाद दौरा
अजित पवार यांनी अलीकडेच जनसंवाद दौऱ्याला सुरुवात केली आहे. हडपसरमध्ये झालेल्या कार्यक्रमाला अनेक सरकारी अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. त्यामुळे नागरिकांना थेट जनता दरबारात आपली गाऱ्हाणी मांडण्याची संधी मिळत आहे. या दौऱ्यांमुळे उपनगरांमधील सुस्तावलेली राष्ट्रवादीची संघटना पुन्हा जागी होईल, असा पक्षातील नेत्यांना विश्वास आहे. “चांद्यापासून बांद्यापर्यंत” जनसंवाद दौरे काढण्याचा अजित पवारांचा मानस जाहीरपणे व्यक्त झाला आहे. त्यामुळे ही फक्त लोकसंपर्क मोहिम नसून महापालिका निवडणुकीची साखरपेरणी असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
महाराष्ट्रातील सत्तेचे समीकरण गेल्या काही वर्षांत वेगाने बदलले आहे. 2014 ते 2019 भाजप-शिवसेना सरकार, त्यानंतर दोन वर्षे महाविकास आघाडी, आणि पुन्हा भाजप-शिंदे गटाची सत्ता. या बदलत्या सत्तासमीकरणाचा थेट परिणाम पुणे महापालिका निवडणुकीवर दिसून येतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे विभाजन आणि अजित पवार गटाची सत्ताधारी आघाडीत झालेली एंट्री हा देखील एक महत्वाचा घटक आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत भाजपसोबत अजित पवार यांचे समीकरण जुळते? की राष्ट्रवादी स्वतंत्र लढणार, हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.
पुणे शहरातील मध्यवर्ती भागात भाजपची पकड, तर उपनगरांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रभाव असे स्पष्ट चित्र आहे. आगामी महापालिका निवडणुकीत पुन्हा भाजपच बहुमत मिळवेल, असा अंदाज वर्तवला जात असला, तरी अजित पवारांनी उपनगरांमध्ये सूर केलेली मोर्चाबांधणी भाजपपुढे तगडे आव्हान उभे करू शकते.














