पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात उन्हाचा तडाखा वाढला असून, यंदा पाऊस कमी पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे पाण्याच्या उपलब्धतेसाठी नियोजन करण्याचे आव्हान महापालिका प्रशासनासमोर उभे राहिले आहे. शाळा पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा कमी होत असल्याने जलसंपदा विभागाने महापालिकेला १५ टक्के पाणीकपात करण्यासंबंधी नोटीस बजावली होती.
राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनीही महापालिकेला केवळ मंजूर कोट्याचेच पाणी देण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात पाणीकपात होणार की नाही, याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली होती. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी याबाबत प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली.
ते म्हणाले, “शहराला आवश्यक असलेले पाणी खडकवासला धरणातून घेतले जाते. शहराची वाढती लोकसंख्या आणि उपलब्ध पाणी यामध्ये मोठा फरक आहे. त्यामुळे वाढीव पाणी कोटा मिळावा, यासाठी जलसंपदा विभाग आणि राज्य सरकारकडे सतत पाठपुरावा सुरू आहे. सध्या धरणात पुरेसे पाणी असल्याने पुणेकरांच्या पाण्यात कोणतीही कपात केली जाणार नाही.”
यंदा पावसाला उशीर होण्याची शक्यता लक्षात घेता महापालिकेने पाणी काटकसरीने वापरावे, असे जलसंपदा विभागाने सुचवले आहे. खडकवासला धरण साखळीत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे. महापालिका पाण्याची गळती रोखण्यासाठी प्रयत्न करत असून, अनेक भागांत मीटर बसविले जात आहेत. आयुक्त राम यांनी सांगितले की, सध्या महापालिका जलसंपदा विभागाने दिलेल्या कोट्यानुसारच पाणी उचलत आहे. जून-जुलैमध्ये पावसाची स्थिती पाहून पुढील निर्णय घेतला जाईल. सध्या तरी पाणीकपात करण्याचे कोणतेही नियोजन नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यातून कोणाला मिळणार विधान परिषदेवर संधी, जोरदार फील्डिंग लागली; मुख्यमंत्र्यांचा कौल कोणाला?
-ना अधिकृत टेंडर, ना करारनामा; PMC जलतरण तलावांचा कारभार रामभरोसे, पुणेकरांची सुरक्षा धोक्यात!














