पुणे : पुणे शहरावर पाणीकपातीची टांगती तलवार असताना, पुणेकरांनी निवडून दिलेले खासदार, राज्य सरकारमधील दोन मंत्री, आमदार आणि महापालिकेतील लोकप्रतिनिधी यांपैकी कुणीच ठोस भूमिका घेत नसल्याने सामान्य पुणेकर नाराज आहेत. स्थायी समितीच्या अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी “एक थेंबही पाणी कमी होणार नाही” असे आश्वासन दिले असतानाही पाणीपुरवठा विभागाने कपातीच्या दोन प्रस्तावांवर काम सुरू केल्याने संभ्रम वाढला आहे. येत्या गुरुवारी देखभाल-दुरुस्तीसाठी शहरात पाणी बंद ठेवण्यात येणार असल्याने, ही पाणीकपातीची सुरुवात आहे का, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
शहराला पाणी पुरवणाऱ्या खडकवासला धरण साखळीत सध्या १२.५७ टीएमसी (४३.१३ टक्के) पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा साठा एक टीएमसीने अधिक आहे. मात्र, यंदा ‘एल-निनो’च्या प्रभावामुळे मोसमी पाऊस कमी पडण्याची शक्यता लक्षात घेऊन जलसंपदा विभागाने गेल्या आठवड्यात महापालिकेला १५ टक्के पाणीकपात करण्याची नोटीस पाठवली आहे.
या नोटिशीनंतर पाणीकपातीची चर्चा सुरू झाली. स्थायी समिती अध्यक्षांनी कपात न करण्याचे आश्वासन दिले असले तरी, जलसंपदा विभागाच्या नोटिशीचा आधार घेऊन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने आठवड्यातून एक दिवस पाणी बंद किंवा दिवसाआड पाणीपुरवठा अशा दोन प्रस्तावांवर काम सुरू केले आहे.
पुण्यात भाजपने महापालिका निवडणुकीत ११९ जागा जिंकून एकहाती सत्ता स्थापन केली आहे. पुण्याचे लोकसभा खासदार, दोन मंत्री आणि सहा आमदार भाजपचे आहेत. राज्यसभा आणि विधान परिषदेतही पक्षाचे प्रतिनिधित्व आहे. तरीही पाण्याच्या प्रश्नावर कोणतीही ठोस भूमिका घेतली जात नाही. सत्तेत सहभागी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ने देखील याबाबत मौन बाळगले आहे. सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी या मुद्द्यावरून प्रश्न उपस्थित केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-अल्प विस्तार, मोठा दिलासा; पीएमपीएमएल बससेवा थेट खडकी जंक्शनपर्यंत
-JSPM-TSSM चा “टेक्नोव्हिजन 2K26” महोत्सव उत्साहात; राज्यभरातील विद्यार्थ्यांचा सहभाग
-मी देवऋषी… तुझी समस्या दूर करेन! पुण्यातील भोंदूबाबाने ४२ वर्षीय महिलेवर केले अत्याचार
-पुण्यात प्राचार्याला ‘पॉक्सो’ धमकी देणाऱ्या रिलस्टार सोनाली हिंगेसह तिघे निलंबित














